(अलिबाग)
तालुक्यातील थळ येथील बीच वॉक रिसॉर्टमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेत स्विमिंग पूलमध्ये विजेचा शॉक लागून श्रीनिवास म्हात्रे (वय ४२, रा. किहीम, ता. अलिबाग, जि. रायगड) यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहा दिवसांच्या गणरायाचे विसर्जन केल्यानंतर रविवारी (दि. ७ सप्टेंबर २०२५) श्रीनिवास म्हात्रे आपल्या नातेवाईकांसह थळ येथील बीच वॉक रिसॉर्टमध्ये मौजमजा करण्यासाठी गेले होते. सध्या हे रिसॉर्ट विनोद गुप्ता यांनी भाड्याने घेतले असून, सुट्टीच्या दिवशी येथे अनेक पर्यटक गर्दी करतात.
दरम्यान, म्हात्रे स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना अचानक विजेचा धक्का बसला. काही क्षणांतच ते बेशुद्ध पडले. नातेवाईक आणि रिसॉर्टमधील कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अलिबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू (A.D.) म्हणून नोंद झाली असून, पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भुंडेरे पुढील तपास करत आहेत.
श्रीनिवास म्हात्रे हे किहीम परिसरातील सामाजिक वर्तुळात प्रतिष्टीत म्हणून ओळखले जाणारे व्यक्ती होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीय, नातेवाईक आणि गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

