(रत्नागिरी / वार्ताहर)
निसर्गाच्या सान्निध्यात आणि ग्रामदैवताच्या कुशीत वसलेल्या रत्नागिरी तालुक्यातील आगवे गावात दिनांक १६ जून २०२५ रोजी एक पर्यावरणपूरक उपक्रम पार पडला. श्री सोंभा वाघजाई भराडीन देवी मंदिर परिसरात वृक्षलागवडीचा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि सामाजिक एकतेने पार पडला.
या उपक्रमाअंतर्गत गावाच्या भविष्यासाठी व पर्यावरण संवर्धनासाठी सुमारे ४०० फुलझाडे व औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. यात शुभकार्यात उपयोगी ठरणाऱ्या आणि देवराई संस्कृतीचे प्रतिक असणाऱ्या विविध प्रकारच्या झाडांचा समावेश होता. नवनवीन पिढ्यांमध्ये निसर्गप्रेम आणि पर्यावरणाविषयी जागृती निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
या संकल्पात गावातील ग्रामस्थ, युवा वर्ग आणि मुंबईकर मंडळींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. गावप्रमुख श्री रामचंद्र गोपाळ मालप, मानकरी श्री पांडुरंग बारगोडे, गुरव श्री दीपक बाळू गोंधळी, माजी सरपंच श्री गुणाजी गंगाराम मालप, विद्यमान सरपंच श्री रमेश गुणाजी मालप यांच्यासह मंदिर कमिटीतील सदस्य श्री सुनील यशवंत मालप, श्री विलास गुणाजी मालप, श्री उमेश दीपक मालप, श्री रवींद्र गुणाजी मालप, श्री कृष्णा बारगोडे आणि अन्य ग्रामस्थ या कार्यात सहभागी झाले होते.
याशिवाय गावातील आजी-माजी विद्यार्थी व ग्रामस्थांचा आर्थिक आणि शारीरिक मोलाचा सहभाग या उपक्रमासाठी लाभला. या वृक्षारोपणामुळे गावाचा परिसर अधिक हिरवागार, निसर्गसमृद्ध व आध्यात्मिकदृष्ट्याही समृद्ध होईल, असा विश्वास सर्व गावकऱ्यांनी व्यक्त केला.