(गुहागर)
तालुक्यात मंगळवार सायंकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी विद्युतपुरवठा खंडित झाला आहे.
सुरेश गोविंद येदरे (रा. तवसाळ, बाबरवाडी) यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले आहे. तसेच महावितरणचा फिडर नादुरुस्त झाल्याने उमराट, डागवाडी, कोंडवीवाडी व धनावडेवाडी येथे गेले तीन दिवस वीजपुरवठा खंडित आहे. वीज नसल्याने पाण्याचा पंप बंद राहिला असून, ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे.
तसेच साखरी त्रिशूळमध्येही पंप बंद राहिल्याने गैरसोय झाली आहे. आवरे येथील पार्वती महादेव खळे यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले आहे. भातगाव येथील विजय मुंडेकर यांच्या बंद घरावर झाड पडून नुकसान झाले.वरवेलीतील नामदेव रत्नू रावणंग यांच्या जनावरांच्या गोठ्यावर झाड पडून नुकसान झाले. त्यांच्या घराचे काम सुरु असल्याने रावणंग कुटुंब गोठ्यातच राहत होते. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. तर बुधवारी रात्री साखरी आगर येथील विकास कदम यांच्या घरावर वीज पडून सर्व्हिस वायरचे तुकडे झाले व घराचे नुकसान झाले.