(राजापूर)
लांजा-राजापूर-साखरपुडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी राजापूर तालुक्याची मान्सूनपूर्व आढावा बैठक पार पडली. बैठकीत विविध शासकीय विभागांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या वेळी आमदार सामंत यांनी पूररेषेबाबत नागरिकांना विश्वासात घेण्यावर भर दिला. त्यांनी सांगितले की, पूररेषेचा पुन्हा आढावा घेऊन त्याचा अहवाल जनतेच्या सहमतीने सादर करावा. तसेच नगरपरिषद हद्दीतील गटारे व मोऱ्या तातडीने स्वच्छ करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
पूरपरिस्थितीत मदतीसाठी नगरपरिषदेतील बोटींना अद्ययावत करून वापरण्यास तयार ठेवण्याचे निर्देशही आमदारांनी दिले. याशिवाय आरोग्य, जलसंधारण, धरणे, दवाखाने, कृषी, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांचा, पूल, मोऱ्या, महावितरण, वनविभाग, शाळा आणि पर्यटनस्थळे या सर्व घटकांचा सखोल आढावा घेण्यात आला. मान्सूनच्या काळात कोणत्याही आपत्तीची पूर्वतयारी म्हणून सर्व विभागांनी सज्ज राहावे, तसेच नागरिकांना कोणतीही हानी किंवा अडचण होणार नाही याची पूर्ण दक्षता घेण्याचे आदेश आमदारांनी दिले. प्रत्येक विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे, अशीही सूचना यावेळी करण्यात आली.
या बैठकीस राजापूर तहसीलदार विकास गंबरे, गटविकास अधिकारी निलेश जगताप, पोलिस निरीक्षक जनार्दन खेडकर, अशपाक हाजू, विलास चाळके, राजू कुरूप तसेच सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.