(सिंधुदुर्ग)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौऱ्यात राजशिष्टाचाराचे पालन न केल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन महसूल अधिकाऱ्यांना निलंबनाचा फटका बसला आहे. सहाय्यक महसूल अधिकारी एस. पी. हांगे आणि ग्राम महसूल अधिकारी व्ही. व्ही. कंठाळे यांनी कोणतेही अधिकृत आदेश नसताना मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमस्थळी हजर राहत राजशिष्टाचाराचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 चे उल्लंघन केल्याप्रकरणी या दोन कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यासाठी संपर्क अधिकारी आणि शिष्टाचार कार्यवाहीसाठी स्वतंत्र नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. मात्र, हांगे आणि कंठाळे यांना या नेमणुकीत स्थान नसतानाही त्यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून मुख्यालयात राहण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट आदेशाचाही भंग केला.
या प्रकारामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन झाल्याचे अधोरेखित होत असून, जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई मंगळवारी आदेशित केली. विशेष म्हणजे, सध्या देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, १ मे २०२५ रोजी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांना पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याचे सक्त आदेश देण्यात आले होते. या आदेशालाही या दोघांनी पायदळी तुडवत मुख्यालयाबाहेर जाण्याचे धाडस केले.
वैभववाडी तहसीलदारकार्यालयातील सहाय्यक महसुल अधिकारी एस. पी. हांगे आणि तहसिलदार कार्यालय मालवणचे ग्राम महसूल अधिकारी व्ही. व्ही. कंठाळे यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ४ च्या पोट-नियम (१) च्या खंड (अ) च्या तरतूदीनुसार या आदेशाच्या दिनांकापासून ते पुढील आदेश काढले जाईपर्यंत निलंबित करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेली ही तडकाफडकी कारवाई प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. राजशिष्टाचाराचे पालन ही केवळ औपचारिकता नसून जबाबदारी आहे, हे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. “शासनाच्या आदेशांना धाब्यावर बसविणाऱ्यांना माफ केले जाणार नाही,” असा कडक संदेशही या प्रकरणातून अप्रत्यक्ष देण्यात आला आहे.