(पुणे)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (१३ मे) सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.
निकालानंतर, विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती तसेच पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याची सुविधा दिली जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://mahahsscboard.in) १४ मे ते २८ मे २०२५ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध असेल.
अर्ज प्रक्रिया:
-
गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी अर्ज करताना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंगद्वारे शुल्क भरावे लागेल.
-
पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेची छायाप्रती घेणे अनिवार्य आहे.
-
छायाप्रती प्राप्त झाल्यानंतर पाच कार्यदिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करावा लागेल.
-
सर्व अर्ज शाळांमार्फत किंवा विद्यार्थ्यांनी स्वतः संकेतस्थळावरून भरता येतील.
अतिरिक्त संधी:
फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या परीक्षेत सर्व विषयांतून प्रविष्ट होऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुणसुधार किंवा श्रेणीसुधार योजनेअंतर्गत तीन संधी (जून-जुलै २०२५, फेब्रु.-मार्च २०२६ आणि जून-जुलै २०२६) दिल्या जातील. जून-जुलै २०२५ मध्ये होणाऱ्या दहावी पुरवणी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया १५ मेपासून सुरू होणार आहे. यामध्ये पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार व खाजगीरित्या अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश असेल. यासंदर्भातील सविस्तर परिपत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे. पुनर्मूल्यांकन व छायाप्रतीसंदर्भात अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.