(संगमेश्वर / एजाज पटेल)
राष्ट्रीयकृत बँकांमध्ये नियुक्त केलेल्या बँकमित्रांना न्याय देण्यासाठी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्टेट बँक मित्राज् असोसिएशनतर्फे रत्नागिरीत गुरुवारी (ता. १) धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील बँकमित्र सहभागी झाले होते.
वित्तीय समावेशकता या नावाने सुरू करण्यात आलेली झिरो बॅलन्स बँक खात्यांची योजना कालांतराने जनधन योजना म्हणून राबवण्यात येऊ लागली आहे. या योजनेंतर्गत करोडो खाती उघडण्याचे उद्दिष्ट बँकांना दिले व ही प्राथमिकता देखील बनवत तुटपुंज्या कर्मचारी संख्येवर हे लक्ष पूर्ण होणे अवघड असलेल्या बँकांनी त्या काळी बँकिंग करस्पॉन्डंट म्हणजेच बँकमित्र यांची भरती चालू केली. त्यांच्या माध्यमातून कोट्यवधी जनधन खाती उघडण्यात आली. जनधन खात्यांचे काम झाल्यानंतर त्या बँकमित्रांना बँकिंग उद्योगातील नित्यनेमाचे बचतखात्यातील कॅश भरणा करणे व काढून घेणे ही कामेदेखील देण्यात येऊ लागली.
त्याचबरोबर नवीन बचतखाते उघडण्याची कामेही हे बँकमित्र करू लागले. पूर्वी बँक त्यांना थेट कमिशनच्या स्वरूपात पैसे देत होते. कालांतराने जनधन खात्याची व्याप्तीदेखील वाढली आणि कामाचे स्वरूपही खूप वाढले. त्यामुळे बँकेने त्यातून काढता पाय घेऊन मध्यस्थी नेमले आणि त्यांच्या माध्यमातून बॅकमित्रांचे नियमन होऊ लागले.
सर्व राष्ट्रीयकृत बँकांमधून कार्यरत असलेल्या ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन या संघटनेने पुढाकार घेऊन महाराष्ट्र राज्यपातळीवर महाराष्ट्र स्टेट बँक मित्राज् असोसिएशन ही यांची संघटना स्थापन केली व कामगारदिनाचे औचित्य साधून संपूर्ण राज्यभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले.
रत्नागिरीमध्ये हे धरणे आंदोलन यशस्वी झाले. या आंदोलनाचे नेतृत्व रत्नागिरीमधील बँक मित्राज् असोसिएशन या संघटनेचे चेअरमन शैलेश मासये, निमंत्रक नीलेश कदम, सहनिमंत्रक प्रियांका गावडे, रेश्मा शेलटकर व नितीन पांचाळ यांनी केले.
या आहेत प्रमुख मागण्या
बँकमित्रांना कोणत्याही सेवाशर्ती लागू नाहीत. त्या निर्धारित सेवाशर्ती लागू कराव्यात, बँकमित्र वापरत असलेल्या जागांचे त्याचप्रमाणे स्टेशनरी व वाहनखर्च याची भरपाई देण्यात यावी बँकमित्रांना ते कामकाजाचा भाग म्हणून पैशांची ने-आण करतात त्यामुळे त्यांना विमा संरक्षण मिळावे तसेच बँकमित्रांना सामाजिक सुरक्षितता लागू करून प्रोव्हिडंट फंड, ग्रॅच्युईटी व पेन्शन या अंतर्गत सुरक्षितता मिळावी यांसह इतर अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.