(रत्नागिरी)
शिरगाव (ता. रत्नागिरी) घवाळवाडी येथील, येथील विठ्ठल सोनू आंबेकर (वय ६४ ) यांचे आज निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार नातेवाईकांनी त्यांचे देहदान कऱण्यात आले. जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून झालेले हे ९९ वे देहदान आहे.
नातेवाईक व स्व – स्वरूप संप्रदायाचे पदाधिकारी यांनी आंबेकर यांचे पार्थिव आज येथील रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी त्यांची पत्नी वैजयंती विठ्ठल आंबेकर, मुलगा विराज विठ्ठल आंबेकर, मुलगी मिथिला स्वरूप फुटक, भाऊ विजय सोनू आंबेकर व दीपक बाळकृष्ण आंबेकर आदी उपस्थित होते. मुलगा विराज विठ्ठल आंबेकर देवगड तालुक्यात जि. प. शाळेत शिक्षक आहेत. मुलगी मिथिला फुकट रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नोकरी करीत आहेत. त्याचप्रमाणे देहदान करतेवेळी स्व – स्वरूप संप्रदायतर्फे रत्नागिरी जिल्हा निरीक्षक संदीप नार्वेकर, शिरगाव सेवा केंद्रातील भक्तगण यांच्यासह अनेक कार्यकर्ते वैद्यकीय महाविद्यालयात उपस्थित होते.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीर रचनाशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. रावल, डॉ.कांबळे तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांनी पार्थिव स्वीकारून रीतसर प्रमाणपत्र दिले. संस्थानचे आभार मानले.
अधिष्ठाता रामानंद यांनी संस्थानच्या या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, ” आजपर्यंत ९९ मरणोत्तर देहदान होणे हो मोठी गोष्ट आहे. त्याबद्दल मी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचा ऋणी आहे. “जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्य यांच्या प्रेरणेतून रत्नागिरीत मेडिकल कॉलेजला केलेले दुसरे देहदान आहे. यापूर्वी रमेश काशीराम मोरे यांचे ६ फेब्रुवारी २०२५ ला याच मेडिकल कॉलेजला देहदान करण्यात आले होते.
कै. आंबेकर यांचे संपूर्ण कुटुंब जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या शिष्य परिवारातील आहेत. जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांनी आपल्या भक्तांना मरणोत्तर देहदानाचे आवाहन केले होते. मृत्यूनंतर माणसाचा देह मातीमोल होतो. त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्याऐवजी मरणोत्तर देहदान केले तर त्याचा उपयोग वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शरीररचनाशात्र शिकण्यासाठी होऊ शकतो. त्यासाठी देहदान करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला भक्तांनी फार मोठा प्रतिसाद दिला. संस्थानकडे अर्ज भरले. संस्थानाने ते त्या त्या भागातील वैद्यकीय महाविद्यालयांना पाठवण्यात आले. आजपर्यंत ९९ जणांचे मरणोत्तर देहदान झाले आहे. त्यामुळे महाविद्यालय व विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. त्याबद्दल त्या त्या महाविद्यालयांनी संस्थानचे आभार मानले आहेत.