(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
तालुक्यातील हातखंबा येथे पाच दिवसांपूर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त लावलेला बॅनर अल्पवयीन मुलाने फाडल्याची घटना घडली होती. या प्रकरणासंदर्भात चार दिवस पोलीसांकडून कृत्य करणाऱ्या मुलासह आई-वडील यांनाही बोलावून चौकशी केली जात होती. मात्र चार दिवसानंतर पुन्हा हातखंबा येथील बौद्ध ग्रामस्थांनी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यादव यांची भेट घेतली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत काय आढळून आले याबाबत ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षकांना विचारणा केली.
यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी सांगितले की, मुलाने तो बॅनर स्वतःहून फाडल्याचे सांगितले असून इतर कोणीही त्याला हे कृत्य करण्यास सांगितलेले नाही. कृत्य करण्यास सांगितल्याचा संशय वाटत असेल अशा व्यक्तीचे आपण नाव सांगावे तशीही चौकशी करू, तसेच त्या मुलाची वैद्यकीय तपासणी स्वतः आई वडील करणार आहेत. किंवा मुलाच्या कुटुंबियांनी पोलिसांना करण्यास परवानगी दिल्यास आम्ही वैद्यकीय तपासणी देखील करू शकतो. दरम्यान मुलाची वैद्यकीय तपासणीही पोलिसांकडून करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. तत्काळ ती मागणी बौद्ध ग्रामस्थांसमोरच मान्य करून त्या मुलाची वैद्यकीय तपासणी करण्याकरिता मुलासह आई-वडील यांना बोलावून ती तपासणी करून घेण्याचे आदेश पी आय यादव यांनी आपल्या विभागाला दिले.
बुद्ध धम्माच्या शिकवणीत करुणा एक महत्त्वाचा भाग आहे. खोडकरपणामुळे अल्पवयीन मुलाने हे कृत्य केले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बुध्दाच्या करूणेने आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रज्ञेने त्या अल्पवयीन मुलाला समाजस्तरावर क्षमा करण्यात आली असली तरी भविष्यात अशा घटना खपवून घेणार नसल्याचे बौद्ध ग्रामस्थांनी पोलिसांसमोर ठणकावून सांगितले. या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी आलेल्या बौद्ध ग्रामस्थांसह वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजन कांबळे यांच्यासह तालुक्याचे पदाधिकारी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. यापूर्वी घडलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांबाबत विटंबनेच्या घटना वंचित बहुजन आघाडीच्या मुकुंद सावंत यांनी पोलिसांना सांगून जाणीव करून दिली. अशा घटना घडत असतील तर पोलीसांचा धाक राहिलेला नाही, भविष्यात कोणत्याही महापुरुषांबाबत अशा घटना घडू नये यासाठी पोलिसांनी उपाययोजना कराव्यात असेही सावंत यांनी पोलिसांना सांगितले. यावेळी पांडुरंग कांबळे, राजेंद्र कांबळे, स्वप्नील कांबळे, साहिल कांबळे, रूपेश कांबळे, अनिकेत कांबळे, सुधीर कांबळे, रुपम कांबळे, प्रशांत कांबळे, ॲड सुयोग कांबळे, अमोल कांबळे, आर्यन कांबळे, राहुल कांबळे आदी हातखंबा बौद्धवाडी येथील ग्रामस्थांसह वंचीत बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
कायदा हातात घेऊन हद्दल घडवू….
या घटनेवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष बेटकर मॅडम यांनी ही आपले रौद्ररूप दाखवून दिले. प्रत्येक वेळेस मनोरुग्ण ठरवून आरोपीला सोडून दिले जाते. आम्ही कायद्याला प्रमाण मानतो म्हणून आम्ही संयम दाखवून शांत असतो मात्र पुन्हा अशा प्रकारची घटना जिल्ह्यात किंवा तालुक्यात घडली तर कायदा हातात घेऊन आरोपीला हद्दल आमच्या मार्फत आम्ही घडवू असा थेट इशाराच वंचितच्या महिला जिल्हाध्यक्षा बेटकर मॅडम यांनी पोलिस प्रशासनाला दिला आहे.