(रत्नागिरी / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडीच्या वतीने जागतिक महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाच्या औचित्याने विशेष महिला ग्रामसभा घेण्यात आली. अध्यक्षपदी माजी सरपंच सुमित्रा बलेकर होत्या. तर या सभेसाठी सरपंच सतीश थुळ, उपसरपंच चंद्रकांत मालप, ग्रा.प सदस्य अरुण मोर्ये, प्रणाली मालप, निकिता शिगवण, ममता बंडबे, ग्रामपंचायत अधिकारी श्रीकांत कुळये, म. गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष केशव बलेकर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र वाटदच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रृती कदम, सैतवडे उपकेंद्राच्या धनश्री पावरी, उमेदच्या वाटद प्रभाग व्यवस्थापक दिक्षा निवळकर, अनुजा सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कोरोना काळात निस्वार्थी सेवा देणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र वाटदच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रृती कदम मॅडम यांचा सत्कार करण्यात आला. या विशेष महिला ग्रामसभेत काही महत्वाचे निर्णय /ठराव संमत करण्यात आले ते खालीलप्रमाणे.
1. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील प्रत्येक घर पती-पत्नीच्या जोडनावावर झाल्याची घोषणा.
2. प्रत्येक महिला साक्षर असेल कुणीही अंगठा करणार नाही.
3. घराच्या दारावर नावाची पाटी लागणार
4. प्रत्येक घरच्या परिसरात परसबाग करणार
5. हरघर जल योजना 100/: राबविणार
6. सर्वस्तरातील महिलांना समान मंच व सन्मान
7. महिलांच्या आरोग्य जागृतीसाठी आरोग्य शिबीर आयोजित करणार.
8. रोजगार निमितीसाठी शेवगा लागवड करणार.. महिला रोपवाटिका निर्मितीत सक्रिय सहभागी होणार
9. शासकीय योजना एका क्लिकवर समजण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध केलेल्या स्कॅनरचा वापर करणार
10. महिलांना व्यवसाय व स्वावलंबन प्रशिक्षण व मार्गदर्शन.
11. कर्तृत्ववान महिलांचा जाहीर सन्मान करणार
विविध योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिकेचे दत्तात्रय गुरव व हेरिटेज संस्था लांजाचे संतोष कांबळे यांचं मोलाचे सहकार्य लाभले असे सरपंच सतिश थुळ यांनी सांगितले. यावेळी सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव, महिला सक्षमिकरण व आरोग्यदायी गाव याबाबत चर्चासत्र व संकल्प करण्यात आला.
सभा संपन्नसाठी शक्ती ग्रामसंघ कांबळेलावगण व तिरंगा ग्रामसंघ सत्कोंडी, समुह संसाधन व्यक्ती प्रणाली मालप, संगीता मोर्ये, रसिका महाकाळ, आशा वर्कर्स नेहा पवार, सुजाता खापले, अंगणवाडी सेविका कमल मालप, रूपाली महाकाळ चित्रा बैकर, पो.पा. सुहानी बलेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कांबळेलावगण, पन्हळी व सत्कोंडी गावातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.