(रत्नागिरी)
रत्नागिरीतील कुणबी समाजाचे नेते नंदकुमार मोहिते यांचे आज (गुरुवार) निधन झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. कुणबी समाजासाठी झटणारा एक लढवय्या नेता हरपला असे उद्गार कुणबी समाजाच्या नेत्यांनी त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच काढले.
नंदकुमार मोहिते आणि विविध संघटनांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी काम केले. ओबीसी, कुळ कायदा जमानीविषय प्रश्नांचे ते गाढे अभ्यासक होते. लोकनेते शामराव पेजे महाविद्यालयाचे अध्यक्ष पद त्यांनी सांभाळले. बळीराज सेना पक्षाचे सरचिटणीस पदाची जबाबदारी देखील त्यांनी उत्तमरित्या हाताळली. समाजाच्या विविध प्रश्नांची जाण त्यांना होती. जिल्हा परिषद सदस्य पदावर निवडून आल्यानंतर पाच वर्ष त्यांनी विविध प्रश्नांवर सभागृहात आवाज उठवला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज (गुरुवार) त्यांची प्राणज्योत मावळली.
सलग पंधरा वर्षे सरपंच, त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी केलेले कार्य प्रसंशोयुक्त होते. रत्नागिरी जिल्ह्यातील कुळांच्या समस्या सोडविण्यासाठी अविरत प्रयत्न केले. गावोगावी पायी प्रवास करुन संघटना उभारली. कुणबी व तत्सम ओबीसी समाजाला मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात यासाठी पुढाकार मोर्चा काढण्यात अग्रेसर राहिले. सन 1986 साली रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे येथे कुणबी समाज सामाजिक परिषद आयोजित करण्यात आली होती. या सभेत समाज नेते अण्णासाहेब उर्फ शामरावजी पेजे यांनी श्री नंदकुमार मोहिते यांचे कार्याची जाहिरपणे सभेत प्रशंसा केली होती. त्यावेळी श्री मोहिते कोणत्याही पदावर नसताना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत होते.
सन 1996 साली कुणबी समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक समस्या वेशिवर टांगून राज्य सरकारची कोंडी करण्यासाठी बहुजन विकास आघाडी स्थापन करण्यात आली. यावेळी श्री मोहिते या प्रवाहात सामील झाले. त्यानंतरच्या काळात ते सातत्याने बहुजन विकास आघाडी आणि ओबीसी आरक्षण यासाठी पुढाकार घेऊन संघटनेत सहभागी राहिले. समाज नेते अण्णासाहेब उर्फ शामरावजी पेजे यांच्या नावाने स्वताच्या गावी महाविद्यालय सुरू केले.
मागील पाच वर्षांत श्री मोहिते यांच्या मुंबई भेटी वाढत राहिल्या. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई या संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य म्हणून काम करण्याची इच्छा त्यांनी काही वेळा व्यक्त केली. रत्नागिरी तालुक्यातील कुणबी समाज संघटना आणि ओबीसी समाज संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
रत्नागिरी तालुक्यातील तिल्लोरी कुणबी समाजाचे जात प्रमाणपत्र पडताळणी होण्यास अडचणी निर्माण झाल्यानंतर सर्वप्रथम श्री मोहिते यांनी शासनाकडे पत्र व्यवहार सुरू केला. राज्य सरकारच्या पुराभिलेख संचालनालय मुंबई कार्यालयात जाऊन त्यांनी जूने दस्तऐवज पाहिले. काही नस्ती मधून संदर्भ मिळाले. त्यामुळे राज्य सरकार, मागासवर्गीय आयोगाचे सदस्य यांजकडे त्यांनी पत्रव्यवहार केला. अशी ही हरहुन्नरी व्यक्तिमत्व असणारी व्यक्ती अचानक निघून गेली, ही अतिशय वेदनादायी घटना आहे. त्यांच्या कार्याची दखल पुढच्या पिढीला प्रेरणा देणारी आहे.