( विशेष /प्रतिनिधी )
मुंबई-गोवा महामार्गावरील पाली भागातील रस्ता सध्या अक्षरशः खड्ड्यांनी गिळंकृत केला आहे. वाहनधारकांना जिवावर उदार होऊन प्रवास करावा लागत असून, हा रस्ता की मृत्यूचा सापळा, असा सवाल आता उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यासमोरच महामार्गाचा रस्त्याची दुर्दशा झालेली पाहायला मिळत आहे. मात्र संबंधित यंत्रणांचे डोळे उघडत नाहीत, हे जास्तच खटकणारे चित्र आहे.
हातखंबा ते पाली मार्ग हा रत्नागिरी शहराशी दैनंदिन व्यवहारांसाठी जोडणारा मुख्य मार्ग असल्याने रस्त्यावर रोजची वर्दळ असते. या भागातील मार्गावर मोठमोठे खड्डे चिखलाने भरून गेले असून, रात्रीच्या वेळेस तर या खड्ड्यांचे अस्तित्व जाणवतच नाही. अपघातांची शक्यता सतत डोक्यावर आणि त्यात पावसामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. या महामार्गाचे काम करणाऱ्या ईगल कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे लोकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. ठेकेदाराला ना जनतेची फिकीर, ना प्रशासनाची भीती! या मार्गावर कायमस्वरूपी चोवीस तास देखरेख करणारी यंत्रणा सज्ज ठेवावी, अशी आता मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
या पट्ट्यातील काँक्रीटीकरणाचे काही तुकडे उरकले गेले असले, तरी उर्वरित रस्ता अजूनही मृत्यूचा सापळाच बनत चालला आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर खड्ड्यांचे साम्राज्य वाढले, पण कंपनीचे अधिकारी त्या खड्ड्यांइतकेही खोल विचार करत नाहीत. पाहणी दौरे करणे, कामाची गुणवत्ता तपासणे ही त्यांची जबाबदारी आहे की नाही? की ठेका मिळाल्यावर जनतेच्या वेदना त्यांच्या कामाच्या परिभाषेतच नाहीत? डोळे असून अंधपणे चालणाऱ्या अधिकाऱ्यांची ही बेफिकिरी मुळातच धोकादायक आहे. त्यांची ही निष्क्रियता केवळ प्रशासकीय दुर्लक्ष नाही, तर थेट जनतेच्या हक्कांवर आणि जीवावर गदा आणणारी आहे. रस्त्यांवरील खड्डे फक्त डांबरी अपयश नाही, ते प्रशासनाच्या अपयशाचे खोल चिठ्ठे आहेत.

दोन दिवसांपूर्वी हातखंबा येथे अवघड वळणावर अपघात होऊन एका प्रसिद्ध उद्योगकर्त्यांचा मृत्यू झाला. कारण अज्ञात वाहनाने धडक दिल्याचे असले तरी तेथील वळणावर खड्डे आणि सांडलेली बारीक खडी. या परिस्थितीची जबाबदारी नक्की कोण घेणार? मृत्यू झाल्यानंतरही तेच रस्ते, तेच खड्डे हे किती काळ चालणार? खड्डे, बारीक खडी, चिखल, अपूर्ण काँक्रीटीकरण आणि धोकादायक वळणे हे सगळे जनतेला दिसत आहे, पण ज्यांच्या जबाबदारीत हे सुधारायचे आहे, त्यांना काहीच दिसत नाही का? पावसात या खड्ड्यांमध्ये भरलेला चिखल अपघातांना आमंत्रण देत आहे. याप्रकरणी महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी, जिल्हा प्रशासनाने गंभीरपणे लक्ष देणे गरजेचे आहे. केवळ आकड्यांचा खेळ आणि पत्रव्यवहार करून काहीही साधणार नाही, हे आता अधोरेखित झाले आहे. आता पालकमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेऊन, संबंधित अधिकाऱ्यांची झडती घ्यावी, कामांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवावे, आणि हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदार कंपन्यांवर कारवाई करावी. एकूणच पालकमंत्र्यांनी जनतेच्या वेदनांसारखे याकडे पाहिले पाहिजे. अशी जनभावना निर्माण झाली आहे.