(रत्नागिरी)
कोणत्या विभागात किती खर्च झाला, झाला नसेल तर त्याची कारणे काय याबाबत जिल्हाधिऱ्यांनी प्रत्येक विभागाचा आढावा घ्यावा. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी जनसुविधेला प्राधान्य द्यावे, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. अंमलबजावणी अधिकाऱ्यांकडून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 साठी 860.21 कोटीच्या आलेल्या मागणीच्या आराखड्यास आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. गृहराज्यमंत्री योगेश कदम, खासदार सुनिल तटकरे, खासदार नारायण राणे, आमदार प्रसाद लाड,आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, मागील वर्षी जिल्ह्याच्या तरतूदीमध्ये भरीव वाढ झालेली आहे. यावर्षीही ती होईल. 860 कोटींचा आराखडा बनविण्यात आला असून, राज्य नियोजन समितीच्या बैठकीमध्ये त्याबाबत निश्चितपणाने मागणी केली जाईल. जनसुविधेला प्राधान्य देताना 100 टक्के निधी खर्च झाला पाहिजे, त्याबाबत अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. नगरपंचायत, नगरपालिका यांचा विकासात्मक डिपीआर तयार करावा. प्रत्येक शहराचा विकासात्मक नियोजन करताना लागणाऱ्या निधीबाबत सविस्तर माहिती द्यावी. प्रत्येक तालुकानिहाय जेट्टींचा प्रस्ताव तयार करुन द्यावा.
रत्नागिरी जिल्हा परिषदेने गोळप येथे केलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पातून निर्माण झालेल्या रत्नागिरी पॅर्टन राज्यात उदयास आला आहे. त्याचबरोबर टॅलेंट सर्च करुन इस्त्रो आणि नासासाठी जिल्हा परिषदेमार्फत विद्यार्थ्यांना पाठविण्यात येत आहे. हा उपक्रम राज्यातील 7 जिल्ह्यांनी स्वीकारला आहे. गुहागरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीबाबत चांगले नियोजन करावे. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीबाबतचा आढावा दर 15 दिवसांनी घ्यावा. ऑक्टोबरपर्यंत कार्यांरभ आदेश व्हायला हवेत, यापध्दतीने अधिकाऱ्यांनी नियोजन करावे.
विधानसभा निवडणुकीनंतर अस्तित्वात आलेल्या शासनाचे, पालकमंत्री उदय सामंत, प्रधानमंत्री नरेंद मोदी, गृह मंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. आमदार निकम यांनी डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. याप्रस्तावाला पाठींबा देताना खासदार राणे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत यश मिळवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्वांगीण विकासाला चालना देऊन सर्वकष अर्थसंकल्प सादर करुन देशाला जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर आणल्याबद्दल प्रधानमंत्री, अर्थमंत्री आणि सहकारी मंत्र्याचे अभिनंदन करुन शुभेच्छा देतो.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी संगणकीय सादरीकरण करुन 31 मार्च पर्यंत 100 टक्के निधी खर्च केला जाईल, असे सांगितले. सभेच्या सुरुवातीला दिवंगत माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहण्यात आली. खासदार राणे, खासदार तटकरे, आमदार निकम, आमदार जाधव, आमदार लाड, आमदार सामंत यांनी विविध विषयांवर सहभाग घेतला. प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सुचित वंजारे यांनी आभार मानले.