(रत्नागिरी)
रत्नागिरी हे जिल्ह्याचे ठिकाण असून दररोज हजारो प्रवासी विविध कामांसाठी शहरात येत असतात. तसेच अनेक पर्यटकही दाखल होत असतात. अनेक प्रवासी शहरी, ग्रामीण एस्. टी. बस ची थांब्यावर वाट पहात असतात. शहरात अनेक ठिकाणी बस थांबेच नाहीत. मात्र जे काही थांबे आहेत तेही मोडकळीस आलेले आहेत. अनेक ठिकाणी एस्. टी. बस थांब्याची दयनीय अवस्था आहे. काहींची पडझड, दुरवस्था तर काहींचे पत्रे, भिंती ढासळल्या आहेत. तर बहुतेक सर्वच थांब्यामध्ये स्वच्छता, कुत्र्यांचा वावर आहे. त्यामुळे प्रवाशांना खूप त्रास होतो. तर दिव्यांग व्यक्ती, जेष्चेठ नागरिक यांचे खूप हाल होत आहेत.
बस थांब्यांची ही दुरावस्था गेल्या अनेक वर्षांपासून असून याकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. या बस थांब्यांची स्थिती ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी झाली आहे. त्यातच बसची संख्याही अपुरी असल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप होत आहे. वयोवृद्ध प्रवासी तर तासन्तास बसची वाट पाहत थांबतात. शेवटी कंटाळून खासगी वाहनाने जातात.
एस.टी निवारा शेड सुसज्ज व स्वच्छ असल्यास तेथे वातावरण निर्मिती होऊन ज्येष्ठ नागरिकांसह अनेक नियमित प्रवासी, रुग्ण प्रवासी, पर्यटक, शाळेतील विद्यार्थी आवर्जून थांबतील, त्यांचा ऊन- वाऱ्या पावसापासून संरक्षण होईल. यामुळे एस टी च्या उत्पन्नातही भर पडेल. या सर्व समस्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, यासाठी रत्नागिरी मजगांव येथील सामाजिक कार्यकर्ते एजाज इब्जी यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना छायाचित्रासह दुरुस्तीबाबत निवेदन दिले आहे. मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी तातडीने दखल घेतील,अशी आशा एजाज इब्जी यांनी व्यक्त केली आहे.