(रत्नागिरी)
विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी जेमतेम आठवडा राहिल्याने प्रचाराचा धुरळा उडत आहे. या निवडणुकीच्या कामात अधिकारी व कर्मचारी व्यस्त असल्याने जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असणाऱ्या जिल्हा परिषद भवनात शुकशुकाट पसरला आहे. यामुळे नागरिकांच्याही कामाचा खोळंबा होऊ लागला आहे.
विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागल्यानंतर अनेक शासकीय कार्यालयांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांची नेमणूक निवडणुकीच्या कामासाठी करण्यात आली आहे. या कालावधीत सर्व शासकीय योजना व विकासकामे बंद असल्याने शासकीय कार्यालयांमधील नागरिक व ठेकेदारांची वर्दळ घटली आहे. जिल्हा परिषदेतही हेच चित्र असून, आचारसंहिता लागल्यापासून सर्वच विभागांत शुकशुकाट आहे.
आचारसंहितेमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी झाला आहे. अर्थात निवडणुकीची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर आहे. त्यामुळे आता या कर्मचारी, अधिकारी यांचे प्रशिक्षण सुरू आहे.