( रत्नागिरी )
प्रलंबित विविध प्रश्नांबाबत अँल्युमिनियम प्रकल्पाबाधित शेतकऱ्यांनी मंगळवारी शेती अवजारांसहित परटवणे ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढला. डोक्यावर घमेलं, खांद्यावर फावडे आणि नांगर घेऊन आंदोलनकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.
या मोर्चाचे नेतृत्व अँल्युमिनियम प्रकल्पबाधित शेतकरी संघाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी केले.अँल्युमिनियम प्रकल्पासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी अगदी कमी पैशात संपादित केल्या. शेकडो एकर जागा अँल्युमिनियम प्रकल्पासाठी शासनाने ताब्यात घेतल्या; पण या जमिनीवर प्रकल्प उभा राहिला नाही. ती जमीन अनेक वर्षे पडीक असून, त्यात कसणाऱ्या शेतकऱ्यांचे, त्यांच्या पिढीचे मोठे नुकसान झाले आहे, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. शासनाने ज्या प्रकल्पासाठी जमीन खरेदी केली त्याला २० वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने संपादित केलेल्या जमिनींना आजचा भाव द्यावा. तसेच, प्रकल्पग्रस्त म्हणून संबंधित मुला-मुलींना नोकरी द्यावी आणि ज्या जमिनी कसत नाहीत त्या परत द्याव्यात, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली.