(रत्नागिरी)
जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून रत्नागिरीतील एका महिलेला १ लाखाला गंडा घालण्यात आला. याप्रकरणी दोघांवर रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या आठ महिन्यात जिल्ह्यातील ६१ जणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पीयूष यादव व मीनाक्षी गानोरकर (पूर्ण नाव, गाव माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. हा प्रकार १८ जुलै ते १९ जुलै २०२४ या कालावधीत घडला. रत्नागिरी तालुक्यातील फणसोप सडा येथे राहणाऱ्या एका महिलेला सोशल मीडियाच्या माध्यमातून एक लिंक पाठविण्यात आली. त्यानंतर पीयूष यादव व मीनाक्षी गानोरकर यांनी त्यांच्याशी संपर्क साधून वेगवेगळे टास्क पूर्ण केल्यावर जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर महिलेच्या बहिणीच्या बँक ऑफ इंडियाच्या बँक खात्यावरुन वेगवेगळ्या बँक खात्यावर गंतवणुकीसाठी १ लाख 3 हजार इतकी रक्कम स्वीकारली.
पीयूष व मीनाक्षी या दोघांनी स्वीकारलेल्या रकमेपैकी ३ हजार रुपये महिलेला परत केले. मात्र, १ लाख रुपये परत केले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिली. त्यानुसार शनिवारी (१४ रोजी) दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
जिल्ह्यात फसवणुकीचे गुन्हे वारंवार घडत असून, जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यात ६१ जणांची फसवणूक झाली आहे. या गुन्ह्यांमध्ये १ कोटी ९२ लाख ५८ हजार रूपयांची फसवणूक झाली आहे. फसवणूक झालेल्या रकमेपैकी १२,०७,३३२ रूपये परत मिळविण्यात यश आले आहे.