(रत्नागिरी /प्रतिनिधी)
आकृतिबंधानुसार मंजूर असलेली पदे कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे नव्याने होत असलेल्या ३६५ खाटांच्या प्रादेशिक मनोरुग्णालयासाठी वर्ग करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे ब्रिटिश काळातील सुमारे १५० वर्षांपूर्वीचे रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालय उदगाव येथे हलविण्याची दाट शक्यता वाटू लागली आहे.
रत्नागिरीतील शांत आणि रमणीय परिसरामुळे ब्रिटिशांनी १५० वर्षांपूर्वी बांधलेले प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांसाठी आहे. या रुग्णालयात एकूण १४४ मंजूर पदे आहेत. मात्र, ५० टक्क्यांहून अधिक वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांची पदे रिक्त आहेत. रुग्णांची संख्या अधिक असल्याने या रुग्णांची देखभाल करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यालयीन पदे रिक्त आहेत. रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रुग्णालय प्रशासनाला कमी कर्मचाऱ्यांकडूनच सध्या काम करून घ्यावे लागत असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. यासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत होता. मात्र, आता आकृतिबंधानुसार मंजूर असलेली पदे कोल्हापुरातील जयसिंगपूर उदगाव येथे नव्याने होत असलेल्या ३६५ खाटांच्या प्रादेशिक मनोग्णालयासाठी वर्ग करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे रत्नागिरी येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेले प्रादेशिक मनोरुग्णालय बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मात्र, दीडशे वर्षांपासून कोल्हापूर, सांगली. सातारा, सिंधुदुर्ग, गोवा आदी ठिकाणच्या रुग्णांसाठी असलेले हे प्रादेशिक मनोरुग्णालय आता रत्नागिरीतून काही वर्षांतच स्थलांतरित होणार आहे. मात्र, हे रुग्णालय रत्नागिरीत ठेवण्याबाबत येथील लोकप्रतिनिधींना फारसे स्वारस्य असल्याचे दिसत नाही. या रुग्णालयात अधून मधून गर्दी पाहायला मिळत असते. मात्र मतदारसंघात असलेले मनोरुग्णालय स्थलांतरित होण्याच्या प्रक्रियेवर मंत्री उदय सामंत यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया न देता मौन बाळगल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री तसेच स्थानिक आमदार म्हणून ते कोणती भूमिका मांडणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.
प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता
पश्चिम महाराष्ट्राच्या मागणीचा विचार कोल्हापूर, सांगली व सातारा येथील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना पुणे किंवा रत्नागिरी येथील मनोरुग्णालयात यावे लागते. त्यामुळे कोल्हापूरमध्ये मनोरुग्णालय व्हावे, यासाठी कित्येक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. पश्चिम महाराष्ट्राची ही मागणी लक्षात घेत उदगाव येथे रत्नागिरीच्या धर्तीवर ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्याबाबतच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याने आता उदगाव येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाचा मार्ग मोकळा झाला आहे. काही दिवसांतच या मनोरुग्णालयाच्या नव्या बांधकामाचे भूमिपूजन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.