( रत्नागिरी / वार्ताहर )
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या वतीने ‘Rotary Rain Run – Say No to Drugs’ या उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. अंमली पदार्थमुक्त समाजाचा संदेश जनमानसात पोहोचविणे, युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करणे आणि निरोगी जीवनशैलीचा प्रसार करणे हा या उपक्रमामागील उद्देश होता. या मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तसेच मुंबई, कोल्हापूर आणि पुणे येथूनही धावपटू रोटरी रेन रनमध्ये सहभागी झाले होते.
उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांच्या हस्ते झेंडा दाखवून ‘Rotary Rain Run’चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक श्री. नितिन बगाटे, रोटरीचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रताप पुराणिक, डी.वाय.एस.पी. अभिजीत थोरात, रोटरी कर्नाटक-गोवा डिस्ट्रिक्टचे गव्हर्नर इलेक्ट अशोक नाईक तसेच रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष अॅड. मनिष नलावडे यांच्यासह रोटरी पदाधिकारी, सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते.
पावसात धावताना धावपटूंनी ‘Say No to Drugs’चा प्रभावी संदेश दिला. युवकांनी अमली पदार्थांपासून दूर राहून निरोगी आणि सकारात्मक जीवनशैली स्वीकारावी, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या रेन रनमध्ये ३ किलोमीटर आणि ५ किलोमीटर अशा दोन गटांत धावपटूंनी सहभाग घेतला. विविध वयोगटातील धावपटूंनी उत्साहाने धावत या सामाजिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
रेन रनचे विजेते
५ किलोमीटर गटात अमेय धुळप यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पार्थ मयेकर यांनी द्वितीय, तर समर्थ फुटक यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
३ किलोमीटर गटात राज पालवकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. स्वागत पाटील यांनी द्वितीय, तर पंकज गोताड यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. रोटरी क्लबच्या वतीने विजेत्यांसह सहभागी सर्व धावपटूंचे अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाला रोटरी पीडीजी प्रताप पुराणिक, रोटरी कर्नाटक-गोवा डिस्ट्रिक्टचे गव्हर्नर इलेक्ट अशोक नाईक, रोटरी क्लब ऑफ कुडाळचे रोटे. प्रणय तेली, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनचे रोटे. राजेश घटवाल आणि असिस्टंट गव्हर्नर बिपीन गांधी यांच्यासह रोटरी पदाधिकारी, सदस्य, स्वयंसेवक आणि नागरिक उपस्थित होते.
या उपक्रमाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे सर्व धावपटू, स्वयंसेवक, सहकारी, प्रायोजक, पोलीस प्रशासन आणि रत्नागिरीकर नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

