(रत्नागिरी /प्रतिनिधी)
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असून भारतीय जनता पक्ष केवळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप श्रद्धा ठाकूर यांनी केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस असलेल्या ठाकूर यांनी रत्नागिरीत काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत हा घणाघात केला.
त्यांनी म्हटले की, केंद्रातील मोदी सरकारने महिला आरक्षण विधेयक केवळ आगामी निवडणुका लक्षात घेऊन पुढे आणले असून, त्यामागे खरा उद्देश महिलांचे सक्षमीकरण नसून राजकीय फायदा मिळवणे हा आहे. ठाकूर यांच्या मते, सादर करण्यात आलेले महिला आरक्षण विधेयक मूळ स्वरूपात नसून त्यात सोयीनुसार बदल करण्यात आले आहेत. जर सरकारला खरोखरच आरक्षण लागू करायचे असेल, तर जनगणनेनंतर स्पष्टपणे अंमलबजावणीची घोषणा करायला हवी होती. मात्र, याबाबत संदिग्धता ठेवण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
त्यांनी पुढे आरोप केला की, उत्तर भारतात खासदारांची संख्या वाढवण्याचा घाट सरकार घालत आहे. सध्याच्या ५४२ जागांवरून ही संख्या ८५० पर्यंत नेण्याचा प्रयत्न होत असून, ३३ टक्के महिला आरक्षणाच्या नावाखाली राजकीय समतोल साधण्याचा डाव आखला जात आहे. काँग्रेस पक्ष कधीही महिला विरोधी नव्हता आणि राहणार नाही, असे स्पष्ट करत ठाकूर म्हणाल्या की, स्थानिक स्वराज्य संस्था ते विविध समित्यांपर्यंत महिलांना संधी देण्यात काँग्रेसने नेहमीच पुढाकार घेतला आहे. महिला आरक्षण मंजूर असले तरी त्याची अंमलबजावणी ज्या पद्धतीने केली जात आहे, त्यामागे लोकहितापेक्षा राजकीय स्वार्थ अधिक असल्याचा पनरुच्चार त्यांनी केला.

