(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील पाचल येथे २ एप्रिलपासून श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा होत आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
गुरुवारी, २ एप्रिल रोजी पहाटे ४.०० ते ५.३० या वेळेत नारकर वाडी ते हनुमान मंदिर, पाचल अशी पायी दिंडी यात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ५.०० वाजता किर्तनकार ह.भ.प. विद्याधर उर्फ राजुशास्त्री शशिकांत करंबेळकर यांचे कीर्तन होईल. सकाळी ६.२६ वाजता श्री हनुमान जन्मोत्सवाचा मुख्य सोहळा पार पडेल.
सकाळी ८.०० वाजता सिद्धकला महिला भजन मंडळ, पाचल यांचे सुमधुर भजन आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ५.०० वाजता भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार असून रात्री ८.०० वाजता श्री हनुमान मित्र मंडळ, नारकरवाडी यांचे भजन होणार आहे.
शुक्रवारी, ३ एप्रिल रोजी दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रात्री १०.०० वाजता ‘चिमणी पाखरं, कुडाळ’ यांचा ‘जलवा’ हा नृत्याविष्कार सादर होणार आहे.
शनिवारी, ४ एप्रिल रोजी नारकर वाडीत सत्यनारायणाची पूजा ठेवण्यात आली असून रात्री १०.०० वाजता केदारलिंग नाट्य नमन मंडळ, काटवाडी-देवरुख यांच्याकडून ‘सिंधुसुरांचा वध’ व ‘विधात्याचा न्याय अर्थात कर्माचे फळ’ हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.
या तीन दिवसीय श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री हनुमान मित्र मंडळ, नारकरवाडी (पाचल) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

