(संगमेश्वर)
डोंगर-दऱ्यांमध्ये विखुरलेल्या संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण वयोवृद्ध नागरिक आणि महिलांना जमिनीच्या कागदपत्रांसाठी दररोज प्रवासाचे कष्ट घ्यावे लागत आहेत. देवरूख येथील भूमी अभिलेख कार्यालयात येताना त्यांना एस.टी., खासगी वाहने किंवा पायीचा आधार घ्यावा लागतो. मात्र, कार्यालयात गेल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या उदासीन आणि नकारात्मक वागणुकीमुळे नागरिकांना मोठी निराशा पदरी पडत आहे.
जमिनीच्या मालकीचे पुरावे, फेरफार, ७/१२ उतारे, नकाशे या महत्वाच्या दस्तऐवजांसाठी अनेकदा दूरवरून आलेल्या नागरिकांना ‘कागद नाहीत’, ‘येऊन जा’ किंवा ‘याचा वेळ नाही’ असे सांगून रिकाम्या हाताने परत पाठवले जात आहे. यामध्ये केवळ वेळच नव्हे, तर गरीब नागरिकांचा पैसा आणि मानसिक त्रासही वाढत आहे.
अधिक त्रासदायक बाब म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कार्यालयातील कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या व्यथेशी कोणतीही संबंधितता जाणवत नाही. गरीब, अशिक्षित व ज्येष्ठ नागरिकांप्रती करुणा वा समजूतदारपणा दाखवण्याऐवजी असंवेदनशीलतेची वागणूक त्यांना मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर, उपअधीक्षक श्री. भागवत हे कर्तव्यदक्ष व नागरिकाभिमुख अधिकारी म्हणून परिचित असले तरी त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे त्यांची प्रतिमा धुळीला मिळण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे श्री. भागवत साहेब या प्रकारांकडे लक्ष देतात का, आणि नागरिकांच्या सोयीसाठी कोणते उपाययोजना करतात, याकडे संपूर्ण संगमेश्वर तालुक्याचे लक्ष लागले आहे.