(रत्नागिरी / वार्ताहर)
कळझोंडी गावातील सडेवाडी येथील सुपुत्र श्री. उदय केरु अगोंडे व सौ. हर्षदा उदय अगोंडे या दांपत्याने त्यांच्या चिरंजीव उर्विश याचा वाढदिवस एका आगळ्या-वेगळ्या आणि समाजहिताच्या उपक्रमाने साजरा करत कळझोंडीसह संपूर्ण जिल्ह्यात एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे.
हे दांपत्य आपल्या मुलाचा वाढदिवस नेहमीसारखा हॉटेल, गार्डन किंवा घरी मोठ्या थाटामाटात साजरा करण्याऐवजी त्यांनी हा विशेष दिवस सामाजिक संस्थेतील गरजू बालकांसोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी वाढदिवसासाठी निवळी येथील ‘माहेर संस्था’ निवडली, जी महिलांसाठी आणि बालकांसाठी काम करणारी एक प्रतिष्ठित सामाजिक संस्था आहे. माहेर संस्थेमध्ये वाढदिवस साजरा करण्याचे हे त्यांचे दुसरे वर्ष आहे.
वाढदिवसाच्या औचित्याने, उर्विशच्या कुटुंबीयांनी संस्थेतील बालकांना खाऊ वाटप केले, तसेच शालेय साहित्य – वह्या, पेन, पेन्सिल, वह्यांचे संच, रंगपेटी यांचे वाटप करून त्यांच्या शिक्षणात मदतीचा हात दिला. याशिवाय संस्थेला अन्नधान्याच्या स्वरूपात ५० किलो तांदूळ देण्यात आला.
या उपक्रमात उर्विशच्या मामांनी – श्री. मयुर गोणबरे यांनी देखील सहभाग घेत ५० किलो तांदूळ देत आपले योगदान दिले. त्यांच्या या सामाजिक जाणिवेने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांपासून ते उपस्थित सर्वांच्या मनात आपुलकी निर्माण केली.
वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी ‘माहेर’ संस्थेचे प्रकल्पप्रमुख व अधीक्षक श्री. सुनील कांबळे, संस्थेतील महिला, बालके तसेच उर्विशचे पालक श्री. उदय व सौ. हर्षदा अगोंडे, आजी-आजोबा श्री. मुरलीधर व सौ. मयुरा गोणबरे, मामा श्री. मयुर गोणबरे, श्री. सचिन गोणबरे, श्री. दिनेश गोणबरे, श्री. सुभाष कुर्टे, कु. प्रणित गोणबरे आणि इतर नातेवाईक उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी जपत, आपला खास दिवस इतरांसोबत साजरा करण्यामागे एक मोठा सकारात्मक विचार आहे. अशा प्रकारच्या उपक्रमामुळे वाढदिवसाला एक सामाजिक अर्थ प्राप्त होतो आणि ते केवळ कुटुंबापुरते मर्यादित राहत नाहीत, तर समाजासाठी प्रेरणादायी ठरतात.
कळझोंडी आणि सडेवाडीतील अनेकांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले असून, तरुण पिढीला सामाजिक जाणिवेचा एक नवा मार्ग या माध्यमातून मिळाला आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि गरजूंना यातून दिलासा मिळतो.