(रत्नागिरी / प्रतिनिधी)
भारत- पाकिस्तान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने तातडीने आरोग्य यंत्रणेला सज्ज ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील सर्व खाजगी व शासकीय रुग्णालयांचे प्रमुख आणि डॉक्टरांची एक आपत्कालीन बैठक आज शासकीय रुग्णालय येथे घेण्यात आली.
जिल्हा आरोग्य अधिकारी आठल्ये यांच्या माध्यमातून सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालयांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून, आवश्यक औषधे, वैद्यकीय उपकरणे, आणि रक्तसाठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. रुग्णवाहिका सेवा २४ तास कार्यरत ठेवण्यात आली असून, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन कक्ष तयार करण्यात आले आहेत.
या कालावधीत स्टाफच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या असून डॉक्टर, नर्सेस आणि पॅरामेडिकल स्टाफ यांचे शिफ्टनुसार नियोजन करण्यात आले आहे. जेणेकरून सतत वैद्यकीय सेवा उपलब्ध राहतील. काही ठिकाणी तात्पुरते उपचार केंद्र सुरू करण्याच्या हालचाली देखील आहेत. एकूणच जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था ही संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे पाहायला मिळत आहे.