(रत्नागिरी / प्रतिनिधी)
गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा बोटीतून पडून समुद्रात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (२४ एप्रिल) सायंकाळी ५:४५ वाजता घडली. सुरेश जेटानंद गावराणी (वय ४९, रा. ताराबाई पार्क, कापसे, जि. कोल्हापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
गावराणी हे पत्नी, सासू, मुलगा व मुलीसह गणपतीपुळे देवदर्शन आणि पर्यटनासाठी आले होते. सायंकाळी त्यांनी कुटुंबासह समुद्रात ड्रॅगन बोटीचा आनंद घेत असताना, अचानक बोटीवरील तोल जाऊन ते पाण्यात पडले. त्यांनी लाईफ जॅकेट परिधान केले असले तरी समुद्रातील मोठ्या लाटांमुळे त्यांना बाहेर येणे अशक्य झाले. ही घटना लक्षात येताच स्थानिक बोट व्यावसायिक व जीवरक्षकांनी तत्काळ बचावकार्य सुरू करून त्यांना पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर गणपतीपुळे देवस्थानची रुग्णवाहिका बोलावून मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे गावराणी यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. प्रकरणाचा तपास जयगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.