(रत्नागिरी)
साडेतीन महिन्यांपूर्वी तालुक्यातील तोणदे येथे पार्टी करताना मद्यप्राशन केलेल्या दोघांचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू कशाने झाला याचे कारण अस्पष्ट होते. मात्र दोघांच्या मृत्यूचे गूढ उकलले असून विषारी औषधासाठी वापरलेल्या सोडा बाटलीतून दारू प्राशन केल्यामुळे मृत्यू झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी एका विरोधात सोमवार, १६ डिसेंबर रोजी रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुदर्शन प्रकाश शिरधनकर (वय ३३, रा. तोणदे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. या घटनेत विघ्नेश देवेंद भाटकर (२४), समाधान प्रकाश पाटील (४६) यांचा मृत्यू झाला होता. २० ऑगस्ट २०२४ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमाराला तोणदे येथील बीएसएनएल टॉवरच्या खाली सुदर्शन शिरधनकर, विघ्नेश भाटकर आणि समाधान पाटील हे तिघेही पार्टी करण्यासाठी बसले होते. त्यावेळी सुदर्शन शिरधनकर याने कोणीतरी तणनाशक विषारी औषधासाठी वापरलेल्या एका सोड्याच्या बाटलीमध्ये दारू मिक्स केली होती.
मात्र, त्याने कोणतीही शहानिशा न करता किंवा ही बाटली कसली आहे, याची खात्री न करता अनवधानाने बाटलीमध्ये दारू ओतली होती. ही दारू विघ्नेश भाटकर व समाधान पाटील यांना दिली होती. ही विषारी दारू प्राशन केल्यामुळे तिघांवर रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी कोल्हापूर आणि नंतर मुंबईला नेण्यात आले होते. त्याठिकाणी उपचार सुरू असताना विघ्नेश भाटकर आणि समाधान पाटील या दोघांचा मृत्यू झाला होता, तर सुदर्शनवर अजूनही उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी ग्रामीण पोलिस स्थानकात परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक सुनील चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून सुदर्शन विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०६ (१) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.