(नवी दिल्ली / वृत्तसंस्था)
रस्ते अपघातांना आळा घालण्यासोबतच रात्रीच्या वेळी वाहनचालकांसाठी प्रवास अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार वाहनांच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) केंद्रीय मोटार वाहन नियमांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव तयार केला असून, हे नवे नियम एप्रिल २०२७ पासून लागू होण्याची शक्यता आहे.
प्रस्तावित नियमांनुसार, नव्या दुचाकींमध्ये असलेली ऑटोमॅटिक हेडलाइट प्रणाली केवळ लो-बीम मोडवरच कार्यरत राहणार आहे. सध्या काही वाहनांमध्ये ऑटोमॅटिक हेडलाइट सुरू झाल्यानंतर ती हाय-बीमवर राहण्याची शक्यता असते. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनचालकांच्या डोळ्यांवर तीव्र प्रकाश पडून त्यांना रस्ता पाहण्यात अडचण निर्माण होते. हा त्रास कमी करण्यासाठी ऑटोमॅटिक हेडलाइट केवळ लो-बीमवर ठेवण्याचा प्रस्ताव आहे.
विशेष म्हणजे, हा बदल नव्याने बाजारात येणाऱ्या वाहनांना लागू होणार असून, आधीपासून रस्त्यावर धावणाऱ्या जुन्या वाहनांवर त्याचा परिणाम होणार नाही.
हेडलाइटच्या प्रकाशाच्या तीव्रतेवरही मर्यादा आणण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार, दुचाकींच्या हेडलाइटची कमाल ब्राइटनेस मर्यादा १.५ लाख कँडेला वरून १ लाख कँडेला करण्याचा विचार आहे. चारचाकी वाहनांसाठी ही मर्यादा २.२५ लाख कँडेला वरून १.५ लाख कँडेला करण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय अतिशय पांढऱ्या आणि डोळ्यांना त्रासदायक प्रकाशावर नियंत्रण ठेवण्यासाठी हेडलाइटच्या रंगाचे कमाल कलर टेम्परेचर ६,५०० केल्विन निश्चित करण्याचीही तरतूद प्रस्तावित आहे.
शहरांमध्ये विनाकारण हाय-बीमचा वापर करणाऱ्या वाहनचालकांना सतर्क करण्यासाठी वाहनांमध्ये बीप किंवा ध्वनी इशारा देणारी यंत्रणा बसविण्याचाही प्रस्ताव आहे. शहरातील रस्त्यांवर वाहन चालवताना चालकाने हाय-बीम सुरू केल्यास वाहनातून वॉर्निंग साउंड वाजेल. त्यामुळे चालकाला हेडलाइट लो-बीमवर करण्याची सूचना मिळेल. मात्र, महामार्गावर ६० किलोमीटर प्रतितासपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवत असताना हा इशारा वाजणार नाही. रात्रीच्या वेळी महामार्गावर दूरपर्यंतचा रस्ता स्पष्ट दिसण्यासाठी हाय-बीमची आवश्यकता असते, त्यामुळे हा अपवाद ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, रात्रीच्या वेळी तसेच धुके किंवा खराब हवामानात मोठ्या वाहनांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी बस आणि अवजड ट्रकांवर दर्जेदार रिफ्लेक्टिव्ह टेप लावणेही अनिवार्य करण्याचा प्रस्ताव आहे. रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला उभी असलेली किंवा कमी वेगाने धावणारी मोठी वाहने अंधारात सहज लक्षात येत नाहीत. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांची त्यांच्याशी धडक होण्याचा धोका वाढतो.
रिफ्लेक्टिव्ह टेप लावल्यास मागून येणाऱ्या वाहनांच्या हेडलाइटचा प्रकाश त्यावर पडताच ट्रक किंवा बस दूरवरूनही स्पष्टपणे दिसू शकतील. त्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी आणि धुक्यात मोठ्या वाहनांची दृश्यमानता वाढून अपघातांचा धोका कमी होण्यास मदत होईल.
रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे, हेडलाइटच्या चकाकीमुळे होणारा त्रास टाळणे आणि रात्रीच्या प्रवासातील सुरक्षितता वाढविणे हा या प्रस्तावित बदलांचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

