(तामिळनाडू)
शिवगंगा जिल्ह्यात रविवारी झालेल्या भीषण रस्ते अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. तिरुपत्तूरजवळ दोन सरकारी बसेसची समोरासमोर टक्कर झाल्याने हा अपघात घडला, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शिवा प्रसाद यांनी दिली.
प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, दोन बसचा अपघात झाल्यानंतर घटनास्थळी एकच आरडाओरड सुरु झाली. अपघातानंतर स्थानिक लोकही मदतीला धावून गेले. दोन्ही बसचा पुढील भाग चक्काचूर झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्परतेने बचावकार्य करून अनेकांना बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. टक्कर एवढी भीषण होती की दोन्ही बसेसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

बसचा अपघात हा समथवूपुरम या ठिकाणी झाला. दोन्ही बसेसची एकमेकांना टक्कर बसली. त्यातली एक बस कनगयामची होती तर दुसरी बस कराईकुडीची होती. दोन्ही बस सरकारी बस सेवेतील आहेत. या अपघातात आठ महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलाचा मृत्यू झाला. आम्ही अपघात होताच मदतीसाठी आलो. आम्हाला काहींनी सांगितलं की एका महिला बसमध्ये येण्यासाठी स्टॉपवर उभी होती. त्याचवेळी समोरुन बस आली आणि या बसला धडक दिली ज्यात हा अपघात झाला.
दोन्ही बसेसमध्ये ५५ प्रवासी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही बसेसमध्ये मिळून एकूण ५५ प्रवासी बसले होते. या अपघातात जे जखमी झाले आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. अनेकांना या अपघातामुळे मानसिक धक्का बसला आहे. या दुर्घटनेत अनेक प्रवाशांचे हात, पाय फ्रॅक्चर झाले आहेत. काही प्रवाशांना डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. ही टक्कर इतकी जोरदार होती की, जागीच 11 जणांचा मृत्यू झाला. जखमी प्रवाशांपैकी काहींची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

