(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील श्री स्वामी समर्थ मठात यंदा गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. गुरुवार, दि. १० जुलै २०२५ रोजी हा उत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून पार पडणार असल्याची माहिती मठ प्रशासनाकडून देण्यात आली.
सकाळी कार्यक्रमाची सुरुवात श्री गुरूदेवांच्या हस्ते स्वामी पूजन, स्वामी चरणांवर अभिषेक, आणि श्री गुरूचरण पूजनाने होणार आहे. यानंतर भक्तगणांकडून भक्तीभावाने सादर होणारे गायन व स्तोत्रपठण होणार आहे.
दुपारच्या सत्रात श्री गुरूदेवांचे मार्गदर्शनपर प्रवचन, महानैवेद्य अर्पण, महाआरती, तसेच महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. भाविकांसाठी श्री गुरूदेव चरणांचे दर्शन देखील ठेवण्यात आले आहे.
सायंकाळी ६.३० वाजता विशेष ‘दिपोत्सव सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. या दिवोत्सवाचे उद्दिष्ट म्हणजे जीवनातील अडचणी, अंध:कार, दु:ख आणि दारिद्र्य यांचे समूळ निवारण होऊन प्रत्येक भक्ताच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी, असा संदेश या उपक्रमामागे आहे.
या दिपोत्सवासाठी प्रत्येक भक्ताने किमान एक दिवा किंवा त्यापेक्षा अधिक दिवे मठात प्रज्वलित करावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. एका दिव्यासाठी सेवा शुल्क केवळ १० रुपये निश्चित करण्यात आले आहे. उत्सवाच्या निमित्ताने भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री स्वामी समर्थ व सद्गुरूंच्या कृपेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मठ समितीने केले आहे.