(संगमेश्वर)
अंत्रवली ग्रामपंचायतीने दिलेले लेखी आश्वासन हवेतच विरले आहे का? असा प्रश्न सध्या ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे. पत्रकार संदेश जिमन यांनी १२ जून २०२३ रोजी ग्रामपंचायतला दिलेल्या निवेदनात मालपवाडी येथील साकवाच्या दोन्ही बाजूंना चढउतारासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. सध्याच्या स्वरूपात साकवाचा उपयोग धोकादायक असून, त्यावर तोडगा न निघाल्यास उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला होता.
या मागणीची तत्काळ दखल घेत ग्रामपंचायत अंत्रवलीच्या सरपंचांनी लेखी आश्वासन दिले होते, ज्यात नमूद करण्यात आले होते की, “३१ जानेवारीबी २०२४ पर्यंत साकवाचे काम पूर्ण करण्यात येईल.” मात्र, आज पर्यंत हे काम पूर्ण झालेले नाही, तर मग हे दिलेलं आश्वासन केवळ वेळकाढूपणासाठीच होतं काय?
२० जून २०२४ रोजी पत्रकार संदेश जिमन यांनी पुन्हा एकदा ग्रामसेवकाला स्मरणपत्र सादर करत ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी सवाल केला की, “उपोषणाची तीव्रता कमी करण्यासाठीच आश्वासनाचा फसवा प्रयोग तर झाला नाही ना?” ग्रामपंचायतीच्या कार्यक्षमतेवर त्यांनी थेट टीका करत म्हटले की, “पद भूषवण्याची हौस आहे, पण कामात गंभीरता नाही, तर याला प्रशासनिक अकार्यक्षमता म्हणायचं की काही दबावाखाली घेतलेली मागणी दाबण्याचा प्रयत्न?”
संदेश जिमन यांच्या पत्रात पुढे नमूद करण्यात आले आहे की, “जर काम शक्य नसेल, तर ग्रामपंचायतीने स्पष्ट लेखी उत्तर द्यावे आणि आम्हाला कायदेशीर मार्ग अवलंबण्यास मोकळे करू द्यावे.” त्यांनी विशेष ग्रामसभा बोलावण्याची मागणीही केली आहे. या प्रकरणात ग्रामस्थांची मागणी आहे की, संबंधित विभागाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. लाखो रुपयांचा निधी लोकहितासाठी आहे की ठेकेदार आणि त्यांच्या बगलबच्च्यांसाठी, याचा खुलासा व्हावा. काम सुरू न होण्यामागे कोणाचा वरदहस्त आहे? आणि त्यासाठी जबाबदार कोण? या प्रश्नांची उत्तरं प्रशासनाने देणे गरजेचे आहे.