(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी बौद्धवाडी येथील नागरिक पुन्हा एकदा प्रशासनाच्या ढिसाळतेचा बळी ठरत आहेत. १४ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन आयु. धिरज अनंत पवार यांच्या काजू बागेची जमीन सरकली, आणि गावातील मांडवकर वाडीकडे जाणारा मुख्य रस्ता पूर्णतः बंद झाला होता.
या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले की, जिल्हा प्रशासनाचे उपाययोजना, दक्षता आणि पूर्वतयारी या संकल्पनाच केवळ कागदावरच आहेत. यापूर्वीही आयु. धिरज पवार यांनी हरचेरी बौद्धवाडीतील डोंगराळ परिसर धोकादायक असल्याचे निदर्शनास आणून देत प्रशासनाकडे अनेक वेळा लेखी निवेदने सादर केली होती. यावेळी त्यांनी ठोस मागणी केली होती की या भागात संरक्षण भिंतीचे बांधकाम करावे, जेणेकरून दरडी कोसळण्याचे प्रकार रोखता येतील. परंतु, नेहमीप्रमाणेच ही मागणी फाईलमध्ये गाडली गेली, आणि आज तीच फाईल मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेले नागरीकांचे आश्वासन ठरली आहे.
पावसाच्या दणक्याने गेल्या काही वर्षांत हरचेरी बौद्धवाडीत दरड कोसळण्याचे, जमीन सरकण्याचे प्रकार सातत्याने घडत असूनही, प्रशासनाचा अक्षम्य दुर्लक्ष, निष्क्रियता आणि बेजबाबदारपणा यामुळे आज या परिसरातील नागरिक भयभीत आणि संतप्त आहेत. आज जर या भूस्खलनात जीवितहानी झाली असती, तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.