(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील पुनस गावचे सुपुत्र आणि गेली 16 वर्षे जिल्हा न्यायालय रत्नागिरी येथे यशस्वीरित्या वकिली व्यवसाय करणारे ॲड.श्री.सूरज सदानंद मोरे यांची मुंबई उच्च न्यायालयामार्फत घेतल्या गेलेल्या *जिल्हा न्यायाधीश* या पदी निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी बार असोसिएशन या वकिलांच्या बारमधून जिल्हा न्यायाधीश म्हणून निवडून येणारे ते पहिलेच वकील आहेत.
मुंबई उच्च न्यायालयातर्फे दरवर्षी जिल्हा न्यायाधीश या पदासाठी परीक्षा घेतली जाते. सदरची निवड ही पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत याद्वारे केली जाते. साधारण या निवड प्रक्रियेला एक वर्ष इतका कालावधी लागतो. तसेच मुख्य परीक्षेचे दोन म्हणजे दिवाणी व फौजदारी हे पेपर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तपासत असून मुलाखत देखील ते स्वतः घेतात. या तिन्ही परीक्षांमधून मार्गक्रमण करून ॲड. मोरे यांनी या पदाला गवसणी घातली आहे.
गेली 16 वर्षे त्यांचा दिवाणी व फौजदारी खटले चालवण्यामध्ये हातखंडा असून खूप कमी कालावधीमध्ये त्यांनी उत्तम प्रकारे कामे चालवून गरजूंना न्याय मिळवून दिला आहे. आता ते जिल्हा न्यायाधीश म्हणून अत्यंत पवित्र समजले जाणारे न्यायदानाचे काम करणार आहेत.

