(रत्नागिरी)
“काहीतरी सांगण्याची अनिवार उर्मी माझ्यासारख्या लेखकाला लिहायला प्रवृत्त करते. मी लिहितो कारण मला काही सांगायचं असत. वाचनामागे आणि लिखाणामागे माझ्यात कुतूहल असते. माणसांतल्या प्रतिभेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी लेखन करतो. सौंदर्य, चांगुलपणा मला शब्दबद्ध करायला आवडते. लढणाऱ्या माणसात पराक्रम , धैर्य असते, कारण प्रत्यक्षात हीच माणसं इतिहास घडवणारी असतात. त्यांची धडपड , संघर्ष, त्याग आणि योगदानाचा पट उलगडून रसिक वाचकांसाठी मांडायचा माझा प्रयत्न असतो,” असे प्रतिपादन रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष व लेखक ॲड विलास पाटणे यांनी रोटरी क्लब रत्नागिरीच्या कार्यक्रमात केले.
“झाशीची राणी रामशास्त्री प्रभुणे, न्या एच आर खन्ना यांच्या जीवनाचा पट त्यानी उलगडून त्यांचा संघर्ष, त्याग, धैर्य अधोरेखित केले. स्वत:च्या जगण्यातला संघर्ष समाजातील , इतर अनेकांच्या जगण्यातही आहे. शब्दाला सौंदर्य, स्वभाव आणि व्यक्तित्व असू शकतं हे मला कुसुमाग्रज , पुल यांच्या साहित्यामुळे मला उमजले. माझ्या लेखनात जगण्याची उमेद आणि ऊर्जा दिसते. मनाच्या कोपऱ्यात तेवणारा दिवा हा अक्षर साहित्याचा आहे. याच प्रकाशात वाटचाल सुरू आहे. असं करता करता केव्हा तरी रस्ता सापडतो आणि हातातल्या दिव्याच्या प्रकाशात दिशा स्पष्ट होते. याच अक्षरांनी मलाच माझी ओळख झाली. त्यातच मी समाधानी आहे आणि आनंद आहे ” असे मत ॲड पाटणे यांनी पुढे व्यक्त केले.
क्लबचे प्रेसिडेंट श्री रुपेश पेडणेकर यांनी त्यांना सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले, तर सचिव ॲड मनीष नलावडे यांनी परिचय करून दिला. कार्यक्रमाला सिनिअर रोटेरिअन कॅप्टन दिलीप भाटकर ,धरमसी चौहान, प्रकल्प आराध्ये, असिस्टंट गव्हर्नर इलेक्ट श्रीकांत भुर्के, प्रेसिडेंट इलेक्ट प्रमोद कुलकर्णी, निलेश मुळ्ये, मंदार सावंतदेसाई, प्रसाद मोदी, सचिन मुकादम, वेदा मुकादम आदी मान्यवर तसेच रोटरी क्लबचे असंख्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.