( मुंबई )
शाळेत गेलेल्या मुलींना घरी परत आणण्यासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या दांपत्याच्या दुचाकीला खाजगी ट्रॅव्हल्स वाहनाने धडक दिल्याने विरार येथे भीषण अपघात घडला आहे. या अपघातात पत्नीचा मृत्यू झाला असून पती गंभीररीत्या जखमी झाला आहे. राजश्री तांबे असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. मनवेलपाडा येथील डीमार्ट परिसरात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. या अपघात प्रकरणी खाजगी ट्रॅव्हल्स वाहनचालक विजय साळवी (वय-३३) विरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विरार पूर्वेकडे मनवेलपाडा परिसरातील चेतन अपार्टमेंट येथे सचिन तांबे (वय- ४०) आणि राजश्री तांबे (वय- ३६) हे दांपत्य त्यांच्या दोन मुलींसह वास्तव्यास आहेत. त्यांच्या दोनही मुली सकाळी शाळेत गेल्या. त्यानंतर शाळा सुटण्याची वेळ झाल्याने तांबे दांपत्य मुलींना शाळेतून घरी आणण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते.
मुलींना शाळेतून आणण्यासाठी जात असताना समोरून येणाऱ्या एका भरधाव खाजगी ट्रॅव्हल्स वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात राजश्री हिचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी चालवत असलेले तिचे पती सचिन तांबे गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.