(गणपतीपुळे / वैभव पवार)
दोन महिन्यांपूर्वी जयगड परिसरात जिंदाल कंपनीतून वायुगळती झाल्यामुळे अनेक मुलांना, नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. आताही येथे उभारण्यात येत असलेल्या गॅस टर्मिनलला ग्रामस्थांचा विरोध असतानाही कंपनी त्याकडे दुर्लक्ष करत आहे; मात्र ग्रामस्थांचे म्हणणे न ऐकता कंपनीने मनमनी केली तर कायदेशीर लढाई लढण्यासाठी मी तुमच्यासोबत आहे, असे आश्वासन नवी मुंबई येथील अभ्यासू नेत्वृत्व ॲड. रोशन पाटील यांनी नांदिवडे (जयगड, ता. रत्नागिरी) येथे आयोजित प्रबोधन सभेत दिले.
परिसरात राखेचे ढीग मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर साठवून प्रदूषण करत आहेत. तसेच गोडाऊन मध्ये कोळसा न साठवता इतरत्र साठलेला आहे. या सर्वांचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे. पर्यावरण खाते कुठे आहे असाही प्रश्न लोकांनी उपस्थित केला. येणाऱ्या काळात या परिसरातील आरोग्य, जैवविविधता, पर्यटन या सर्व बाबी अबाधित रहाव्या तसेच या सर्व विषयांवर सविस्तर साधक-बाधक चर्चा व्हावी या हेतूने नांदिवडे- जयगड येथील त्रिमूर्ती नाट्य मंडळ सभागृह येथे जन-प्रबोधन सभेचे आयोजन केले होते. यात विविध लोकोपयोगी आंदोलनामध्ये आजपर्यंत मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभाग असलेले, संविधानाविषयी ज्यांचा प्रदीर्घ अभ्यास असलेले तसेच वकीली क्षेत्रात अल्पावधीत नावलौकिक प्राप्त केलेले नवी मुंबई येथील अभ्यासू नेत्वृत्व ॲड. रोशन पाटील यांनी मार्गदर्शन करताना बोलत होते. या सभेला जयगड दशक्रोशीतून सुमारे ७०० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. ही सभा शांततेत पार पडली.
ॲड. पाटील म्हणाले, “जयगड दशक्रोशीचा विचार केला तर गेल्या काही वर्षांमध्ये या परिसरामध्ये विविध उद्योगसमूह व्यवसाय करण्यासाठी आले. सुरवातीला इथल्या स्थानिक तरुण-तरुणींना, व्यवसाय-धंदा मिळेल. येथील आरोग्य, पायाभूत सुविधा सुधारतील हा प्रामाणिक हेतू समोर ठेवून येथील सर्वसामान्य जनतेने आपली वडलोपर्जित जागा कवडीमोल दराने या उद्योग समूहांना विकली. कंपन्यांना जागा मिळाली, उद्योगधंदे उभे राहिले; मात्र दुर्दैवाची बाब अशी की आज पाठी वळून पाहिले तर ना नोकरी-धंदा ना पायाभूत सुविधा, ना आरोग्य यंत्रणा. उलट या सर्वचस्तरावर मोठ्या प्रमाणात त्रास होताना पाहायला मिळतो आहे. यात सर्वसामान्य जनता भरडलेली पहायला मिळते. आपल्या परिसरात उद्योग-धंदे आलेच पाहिजे यात तीळमात्र शंका नाही; मात्र हे उद्योग या ठिकाणी येऊन इथल्या सर्वसामान्य जनतेचे अस्तित्व संपवत असतील तर एक सुजाण नागरिक म्हणून आपण सर्वांनी संविधानिक पद्धतीने या संदर्भात आवाज उठवला पाहिजे.”
या सभेच्या माध्यमातून आपल्यासमोर सध्या असलेले किंवा त्या माध्यमातून आपल्यासमोर भविष्यात येणारे भीषण वास्तव मांडत आहोत. एखाद्या व्यक्तिवर, संस्थेवर किंवा एखाद्या औद्योगिक समूहावर हेतू आरोप करणे हा उद्देश नसून, जे विचार पटतील त्यावर आपण विचार मंथन करून भविष्यातील संविधानिक चळवळीमध्ये साथ देण्याचे आवाहन प्रथमेश गवाणकर यांनी प्रास्ताविकातून केले.
या संपूर्ण सभेचे यु ट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. संबंधित उद्योग समूहाने ग्रामस्थांच्या या सभेची दखल घेवून पुढील कार्यवाही करावी, अशी अपेक्षा स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करीत आहे.