(रत्नागिरी)
रत्नागिरीतून कुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांच्या गाडीला पहाटे झालेल्या भीषण अपघातात ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. तसेच या अपघातात आणखी तिघे जखमी झाले. या भयावह अपघातात मंगलमूर्ती प्रतिष्ठानचे भूतपूर्व सरचिटणीस निवृत्त प्राचार्य प्रताप सावंत देसाई सर, वाहन चालक श्री. भगवान झगडे व श्री. अक्षय निकम यांचे दुर्दैवी निधन झाले. हा अपघात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर जवळ पहाटे ४ वा. झाला.
सर्व भाविक कुंभमेळ्यातील शाही स्नान आटोपून इनोव्हा गाडीने रत्नागिरीला परत येत होते. समोरुन येणार्या डंपरने जोरात धडक दिली. त्यामुळे गाडीचा पुढील भाग पूर्णत: उद्ध्वस्त झाला. हा अपघात इतका भयावह होता की दोघांचे जागीच निधन झाले. श्री. अक्षय निकम यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्यानंतर काही वेळाने त्यांचा दुर्दैवी अंत झाला. महामार्गावरुन प्रवास करणार्या वाहन चालकांनी थांबून अपघातग्रस्तांना सहाय्य केले.
अपघातग्रस्त इनोव्हा गाडीत माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई सर, निवृत्त शिक्षक श्री. रमाकांत पांचाळ सर, श्रीराम मंदिराचे विश्वस्त श्री. संतोष रेडीज, सुप्रसिध्द ऑडीटर श्री. किरण निकम, त्यांचे चिरंजीव श्री. अक्षय निकम व नातेवाईक श्री. प्रांजल साळवी तसेच वाहन चालक श्री. भगवान तथा बाबू झगडे असे ७ जण प्रवास करीत होते. यापैकी तिघांचे दु:खद निधन झाले तर श्री. किरण निकम यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. श्री. संतोष रेडीज, श्री. रमाकांत पांचाळ सर व श्री. प्रांजल साळवी यांना काही प्रमाणात जखमा झाल्या परंतु त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे.