(पुणे)
समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील २१९ विविध पदांच्या जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. राज्यातील ५६ केंद्रावर ऑनलाइन परीक्षा सुरु झाल्या असून दि. १९ मार्च २०२५ पर्यत या परीक्षा होणार आहेत. या परीक्षेसाठी काही उमेदवार परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहचत नसल्याचे दिसून आले आहे. तर काही उशिरा आलेल्या अर्जदारांनी परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळावा म्हणून शासन प्रातिनिधींशी हुज्जत घातली आहे. त्यामुळे परीक्षेच्या कामकाजात अडथळा येऊ नये म्हणून परीक्षार्थीं उमेदवारांनी दिलेल्या वेळेतच परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचेअसे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग उमेदवारांने अर्जात नमूद केल्याप्रमाणे स्वत:चा लेखनिक स्वत:च उपलब्ध करून घ्यावयाचा आहे, कोणत्याही परिस्थतीत समाज कल्याण विभागाकडून लेखनिक उपलब्ध करून दिला जाणार नसल्याचे विभागामार्फत सांगण्यात आले आहे.
ही परीक्षा कॉम्प्युटरबेस पद्धतीने ३ सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील ५६ केंद्रावर दररोज साधारणपणे २२ हजार उमेदवार परीक्षेस सामोरे जात आहेत. त्यामध्ये वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक ५ जागांसाठी ११ हजार २१६ अर्ज, गृहपाल/अधीक्षक-६१ जागांसाठी ४० हजार ९६८, गृहपाल/अधीक्षक (महिला )-९२ जागांसाठी ७३ हजार ६२५, समाज कल्याण निरीक्षक-३९ जागांसाठी ५८ हजार ००९, उच्च श्रेणी लघुलेखक-१० जागांसाठी १ हजार ३१७ , निम्म श्रेणी लघुलेखक-३ जागेसाठी ६२० व लघु टंकलेखक-९ जागांसाठी १ हजार ४४७ असे एकूण २१९ जागांसाठी १ लाख ८७ हजार २०२ उमेदवारांचे अर्ज समाज कल्याण विभागास प्राप्त झाले आहेत.
त्यामध्ये ९९ हजार ५०८ महिला अर्जदार असून ८७ हजार ६५८ पुरुष अर्जदार आहेत. तर ३ हजार ४४८ माजी सैनिक आहेत. या सर्व पात्र उमेदवारांना प्रवेश पत्र ऑनलाइन पद्धतीने या https://sjsa.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. भरती प्रक्रियेस संबंधित अधिकृत माहिती व महत्वाच्या सुचना करिता सदरच्या संकेतस्थळाला उमेदवारांनी भेट द्यावी.
दरम्यान, उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच कोणत्याही व्यक्तीने सदर भरती प्रक्रियेबाबत गैरमार्गाने नोकरी देण्याचे/परीक्षा पास करून देण्याचे किंवा तत्सम स्वरूपाचे आमिष दाखविल्यास अशा भूलथापांना बळी न पडता त्याबाबत नजीकच्या पोलीस स्टेशनकडे तात्काळ संपर्क करावा, असेही आवाहन समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे.